राजश्री आतकरे पवार (8668371826)
काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात स्वीकृत नगरसेवकाचा गाजर दाखवून माघार घेण्यास सांगितली होती

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जनतेने नाकारलेल्या, म्हणजेच निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांना पुन्हा ‘स्वीकृत नगरसेवक’ पदावर बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पक्षाच्या या संभाव्य निर्णयाला भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, यामुळे पक्षात अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली आहे.

निष्ठावंतांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झालेल्या चेहऱ्यांना मागच्या दाराने सत्तेत आणण्याचा प्रयत्न झाल्यास, तो तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, असा सूर आता उघडपणे उमटू लागला आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा हक्क डावलून पराभूत उमेदवारांना संधी देणे, हा ‘जनतेच्या कौलाचा अपमान’ असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
या वादात राज्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निष्ठावंतांच्या मागणीला पाठबळ दिल्याने या आंदोलनाला अधिक धार आली आहे. पाटील यांची ही भूमिका केवळ राजकीय विधान नसून तो पक्षशिस्तीचा कडक इशारा असल्याचे बोलले जात आहे. आता सर्वांचे लक्ष शहरातील प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे लागले आहे:
- आमदार महेश लांडगे
- आमदार शंकर जगताप
- आमदार अमित गोरखे
- आमदार उमा खापरे
- शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
‘तर निवडणुका कशासाठी?’ – कार्यकर्त्यांचा थेट सवाल

”जर पराभवाला काहीच अर्थ नसेल आणि पराभूत उमेदवारांनाच पुन्हा पदे द्यायची असतील, तर निवडणुका कशासाठी घेतल्या जातात?” असा थेट सवाल निष्ठावंतांनी उपस्थित केला आहे. नव्या आणि सक्षम चेहऱ्यांना संधी न दिल्यास पक्षाची मुळे कमकुवत होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निर्णायक वळणावर भाजप
पिंपरी-चिंचवडमधील हे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. ही केवळ पदांसाठीची चढाओढ नसून न्याय आणि सन्मानाची लढाई असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता पक्षश्रेष्ठी यावर काय ठोस भूमिका घेतात आणि निष्ठावंतांना न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
