
पुणे महानगरपालिका निवडणुकीतील निकाल हे अनपेक्षित असून आजवर केलेली विकासकामे हरली आणि पैसा जिंकला असेच म्हणावे लागेल अशा शब्दात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी खंत व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी धक्कादायक पराभवानंतर बोलताना म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून काल मतदान होईपर्यंत सर्वत्र गोंधळ, तणाव,पैशाचा खेळ आणि सत्तेचा गैरवापर पाहायला मिळाला. सुज्ञ मतदार कुठेतरी या प्रकारांना आळा घालतील असा विश्वास होता.पण शेवटी पैसाच मोठा झाला.
मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. वॉर्ड असो प्रभाग रचनाही बदलून मी निवडून आलो ते केवळ विकासकामांच्या जोरावर ;पण यंदा सातव्यांदा निवडणुकीला सामोरे गेलो मात्र जो पराभव पत्करावा लागला तोच मुळात अनपेक्षित तर आहे. शिवाय सत्ताधारी कोणतेही षडयंत्र रचू शकतात यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणावर पैशाचा पाऊस पाडून विकासाला बगल देण्याची खेळी यशस्वी झाली हे लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे.वास्तविक मी ज्यावेळी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक जिंकली,त्यानंतर मी सातत्याने विकासकामांवर भर दिला. मात्र यंदा जो पराभव झाला आहे,तो अनपेक्षित असल्याचे नमूद करताना आबा बागुल यांनी विकासकामांवर विश्वास ठेवून मला ज्या सुज्ञ मतदारांनी मतदान केले त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.
