Share this post:

देशाने संवेदनशील पर्यावरणतज्ज्ञ गमावला

‘देवराया वाचल्या तर माणसे वाचतील’ – अखेरचा संदेश देणारे डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या दुःखद निधनाने देशाच्या पर्यावरण संरक्षण चळवळीतील एक अत्यंत प्रखर, अभ्यासू आणि संवेदनशील आवाज हरपला आहे, अशी भावना वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. माधव गाडगीळ आणि वनराई यांचा अनेक वर्षांचा अतिशय जिव्हाळ्याचा ऋणानुबंध होता. वनराईचे संस्थापक डॉ. मोहन धारिया आणि गाडगीळ सर यांच्यात दीर्घकाळ स्नेहपूर्ण संबंध होते. डॉ. गाडगीळ हे वनराईचे सल्लागार होते आणि त्यांनी संस्थेला पर्यावरण, ग्रामीण विकास, परिसंस्था संवर्धन, स्थानिक लोकसहभाग याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले.

पश्चिम घाट संवर्धनासाठी भारत सरकारने नेमलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालावर आधारित ‘सह्याद्रीची आर्त हाक’ हे पुस्तक वनराईने प्रकाशित केले आहे. त्याचप्रमाणे सामूहिक वनहक्क, लोक जैवविविधता नोंदवही या विषयांवरील त्यांची महत्त्वाची पुस्तकेही वनराईच्या माध्यमातून प्रकाशित झाली. जैवविविधता कायद्याचा भाग असलेली लोक जैवविविधता नोंदवही कशी तयार करावी, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि नागरिकांची भूमिका काय असावी, याबाबत गाडगीळ सरांचे विचार अत्यंत दूरदृष्टीचे होते.

आदिवासी भागातील वनजमिनींचे व्यवस्थापन, त्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग, मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठीची धोरणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन या सर्व विषयांवर त्यांनी वनराईला मोलाचे मार्गदर्शन केले. विशेषतः पाणलोट व्यवस्थापन आणि नैसर्गिक स्रोतांच्या विकासकामांमध्ये पर्यावरणीय समतोल कसा राखता येईल, यावर त्यांनी नेहमी भर दिला.

डॉ. गाडगीळ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेल्या लेखांचे संकलन असलेली तीन पुस्तके लवकरच वनराईच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार आहेत, ही बाबही त्यांनी यावेळी नमूद केली.

डॉ. गाडगीळ यांच्या राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण धोरणांमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेत वनराईच्या वतीने त्यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गाडगीळ सरांच्या जाण्याने वनराईचे वैचारिक, मार्गदर्शपर आणि नैतिक पाठबळ हरपले आहे, असेही धारिया म्हणाले.

महिनाभरापूर्वी ५ डिसेंबर रोजी वनराई संस्थेच्या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशनावेळी दिलेले त्यांचे भाषण हे त्यांच्या आयुष्यातील अखेरचे भाषण ठरले. प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही त्यांनी देवरायांच्या संरक्षणाबाबत व्यक्त केलेली चिंता आणि “देवराया वाचल्या तर माणसे वाचतील” हा दिलेला संदेश आज अधिकच अर्थपूर्ण वाटतो, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. माधव गाडगीळ यांच्या विचारानुसार प्रत्यक्ष जमिनीवर काम करणे आणि त्यांच्या विचारांचा तळागाळामध्ये अधिकाधिक प्रचार – प्रसार करून वनराईच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विचार भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवून वनराईच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा आमचा मानस आहे, असे रवींद्र धारिया यांनी म्हटले आहे.

— रवींद्र धारिया
अध्यक्ष, वनराई

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »