पुणे : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची केवळ तक्रारींची वाट न पाहता संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष पाहणी करावी. धोकादायक खड्ड्यांची तातडीने नोंद करून पाऊस थांबताच कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. तसेच खड्डे दुरुस्तीच्या कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी साप्ताहिक बैठकीत प्रशासनाला दिले.
बैठकीत शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येचा आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या हद्दीतील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्यांचा अहवाल सादर करावा आणि त्याचा नियमित आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे निर्देश देण्यात आले.
ते पुढे म्हणाले, “नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, अपघात टळावेत आणि शहरातील रस्ते सुरक्षित राहावेत, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळा संपताच कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. केवळ कागदोपत्री अहवाल न देता अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन परिस्थितीची खात्री करावी.”
