
सातारा : साहित्याचा प्रसार गावोगावी व्हावा या भूमिकेतून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने शिवार साहित्य संमेलन ही नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. मसाप शाहुपुरी शाखा आणि जकातवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी जकातवाडी येथे शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्यावरणप्रेमी, प्रसिध्द लेखक डॉ. संदीप श्रोत्री यांची निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली
प्रा जोशी म्हणाले, साहित्य परिषदेने ग्रामीण भागात साहित्य चळवळ अधिक गतिमान केली आहे. मसाप पुणे च्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारची शिवार साहित्य संमेलने यापूर्वी घेण्यात आली आहेत. या संमेलनात व्यासपीठ, मंडप , सत्कार, भोजन यावर अनावश्यक खर्च केला जात नाही. थेट शेतकऱ्याच्या शिवारात संमेलन भरवून साहित्य परिषद यानिमित्ताने शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे. जकातवाडी येथे होणाऱ्या शिवार साहित्य संमेलनास प्रभारी प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती आहे. संमेलनात लेखक डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. संंमेलनाध्यक्ष पदी डॉ. संदीप श्रोत्री यांची निवड करण्यात आली आहे. ते रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ सातारा या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके राजहंस प्रकाशनने प्रसिध्द केली आहेत. त्यात एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस यासह विविध पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी दुर्गसाहित्य संमेलन, जैवविविधताबाबत जनजागृती, विकास आणि संवर्धन यामधून शाश्वत विकास कसा होईल यासाठी प्रयत्न, विविध ट्रेकींगमध्ये सहभाग नोंदवला आहे. पक्षी
निरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण आदी विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. या शिवार साहित्य संमेलनास साहित्यिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मसाप शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, जकातवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी केले आहे.